सोमवार, २७ जून, २०११



टाळ-मृदंगाच्या निनादामध्ये समूहस्वरांत आळविलेले अभंगाचे सूर... वैद्यकीय तपासणीपासून ते खाद्यपदार्थांचे वाटप आणि दाढी-कटिंग करण्यापासून ते चपला-बूट दुरुस्ती या माध्यमातून वारकऱ्यांची केलेली सेवा... शहरातील प्रेक्षणीय स्थळांना वारकऱ्यांनी दिलेली भेट... पालखी आणि माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी... अशा भक्तिपूर्ण वातावरणाने पुण्यनगरीमध्ये जणू पंढरी अवतरली.आळंदीहून प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी शनिवारी रात्री भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये विसावली. सव्वादहा वाजता पालखीचे आगमन झाल्यानंतर आरती आणि अभिषेक झाला. पालखी विठोबा मंदिराच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम सादर झाला. रविवारी पहाटे पाच वाजता आणि रात्री आठ वाजता महापूजा झाली. दुपारी बारा वाजता महाप्रसादाचा नैवेद्य दाखविण्यात आला. मंदिरामध्ये दिवस-रात्र दर्शनाची सोय करण्यात आली आहे. दर्शनाला जात असताना बाळगोपाळांसह त्यांचे पालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी "गंध माउली'कडून आवर्जून वारकरी पंथाचे गंध लावून घेतले. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शनासाठी दोन स्वतंत्र रांगा करण्यात आल्या आहेत. प्रमोद बेंगरूट, वसंत कोंढरे, गोरखनाथ भिकुले, तेजेंद्र कोंढरे, अप्पा मानकर या मंदिराच्या विश्‍वस्तांसह कार्यकर्त्यांनी रांगेतील भाविकांच्या दर्शनाची सोय केली. बॅंडपथकाने आरती, अभंग आणि भजनाच्या सुरावटी सादर करून माउलींच्या चरणी आपली सेवा रुजू केली. सोमवारी (ता. 27) माउलींच्या पालखीची पहाटे पाच वाजता महापूजा होणार असून त्यानंतर पालखी बंधू सोपानदेवांच्या नगरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. हडपसर येथे विसावा घेतल्यानंतर दिवेघाटमार्गे पालखी सासवड येथे जाणार आहे. पालखी मार्गाकडे जाताना अभंग गात असलेला संतशिरोमणी तुकाराम महाराजांचा पुतळा पाहून भाविकांचे हात नमस्कारासाठी नकळतपणे जोडले गेले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बालचमूंना आकर्षित करणाऱ्या खेळण्यांची दुकाने थाटली होती. महिलांसाठी बांगड्या, मेंदी आणि रांगोळीचे छाप त्याचप्रमाणे गृहोपयोगी वस्तूंची दुकाने, तर भाविकांसाठी देवदेवतांच्या प्रतिमा असलेली छोटेखानी दुकाने होती. विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. गणेश मंडळांतर्फे चहा-नाश्‍ता आणि सुग्रास भोजनाचा आस्वाद देत वारकऱ्यांच्या चरणी सेवा रुजू करण्यात आली. चपला-बूट दुरुस्तीबरोबरच दाढी-कटिंग या सेवादेखील देण्यात आल्या.वारी नियंत्रणासाठी वॉकीटॉकीचा वापरसंत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त डॉ. प्रशांत सुरू म्हणाले, ""वारीमध्ये विविध स्वयंसेवी संस्था आणि मंडळांतर्फे वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा दिली जाते. त्याचबरोबरीने देवस्थाननेदेखील आपल्या वैद्यकीय सुविधेमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात त्याची गरज कोणालाही पडू नये, अशीच माउलींच्या चरणी प्रार्थना आहे. वारी सुरू झाल्यावर तिचा शेवट हा साधारणपणे चार किलोमीटरचा मार्ग असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 16 वॉकीटॉकीचा उपयोग यंदा प्रथमच करण्यात आला आहे. संस्थानच्या वाहनांचा वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आहे.''

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा